नवी मुंबई – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता गटाच्या महिलांच्या कृषी व बिगर कृषी उत्पादनांना शास्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. मोठ्या कंपन्या आणि खरेदीदार यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी ‘बायर सेलर मीट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले यांनी केले. देशभरातील प्रमुख ४१ साखळी व्यवसाय कंपन्यांचे प्रतिनिधींसह राज्यभरातून स्वयंसहाय्यता गटाच्या आणि शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये २८ करार या कार्यक्रमात संपन्न झाले.
आज दिनांक ४ ओतोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी

बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रुचेश जयवंशी, मुख्य परिचालन अधिकारी श्री. परमेश्वर राउत, अवर सचिव श्री. धनवंत माळी उपसंचालक श्रीमती शीतल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले कि, “ग्रामविकास विभाग उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वायत्त होण्यासाठी अनेक प्रकारे मदत करत आहे. आमच्या महिलांची उत्पादने दर्जेदार आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत. आता त्यांना शास्वत बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. साखळी व्यावसायिक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी पुढे येऊन या महिलांना सक्षम बनण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता ग्रामीण भागातील उमेद च्या महिलांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असल्याने त्यांनी उत्पादित केलेले कृषी आधारित उत्पादने वेगवेगळ्या कंपनी किंवा साखळी व्यावसायिक यांनी घाऊक प्रमाणात खरेदी करून शेता मालाला चांगला परतावा मिळावा. राज्यभरातील ३४ जिल्ह्यातून उमेद अंतर्गत कार्य करत असलेल्या महिलांच्या प्रतिनिधी आपल्या उत्पादनाच्या किंवा शेतमालाच्या नमुन्या सह उपस्थित होत्या. आजच्या मीट मध्ये सोयाबीन, मिरची, हळद, तूर, हरभरा, मका, बाजरी, नाचणी, ज्वारी यासारखे दर्जेदार धान्य आणि कडधान्य तसेच मसाले, गुळ, मध, फळे, वनौषधी, तेलबिया इत्यादी उत्पादने नमुना स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले होते. खरेदीदार म्हणून ३० पेक्षा जास्त संस्था आणि कंपन्या यांचे प्रतिनिधी हजर होते. सेंद्रिय आणि शुद्धता असलेले उत्पादने महिलांनी उपलब्ध करून दिल्यामुळे खरेदीदार संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी करार करण्यासाठी उत्साह दाखवला. या कार्यक्रमात खरेदीदार यांनी दाखविलेल्या रुचीमुळे भविष्यात महिलांना शास्वत बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.
अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रुचेश जयवंशी यांनी उमेद च्या उत्पादक महिलांना सातत्याने विक्रीसाठी वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर खरेदीदार कंपन्यांना उत्तम प्रतीचा आणि शुद्धता असलेला शेतमाल आणि इतर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय ठेवण्यासाठी यंत्रणेला जिल्हा आणि राज्य स्तरावरून कार्यरत करण्यात आलेले असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्य परिचालन अधिकारी श्री परमेश्वर राउत यांनी खरेदीदार यांना राज्यभरातील महिला बचत गटांचे संघटन आणि त्यांची शक्तीस्थळे तसेच या मीट च्या उद्देशाबद्दल कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती पवार यांनी केले.



