नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा ‘आपले सरकार २.०’ हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी निवारण करुन घेता यावे, हा या एकत्रीकरणाचा हेतू आहे.
राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अशा तक्रारींचे निवारण करावे यासाठी “आपले सरकार”ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही तक्रार निवारण प्रणाली www.aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या प्रणालीचे प्रशासकीय व तांत्रिक दृष्टीकोनातून अद्ययावतीकरण करणे आवश्यक होते. त्यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, प्रशासनाकडून तक्रारींचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठ कार्यालयांकडून या प्रक्रियेचे संनियंत्रण इ.संदर्भात शासनाने या प्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधीची विहित कार्यपद्धती निश्चित केली आहे. संबंधित शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शासनाने आता “आपले सरकार २.०” या संगणकीकृत तक्रार निवारण प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे नवीन वैशिष्टे विहित केली आहेत. काय आहेत ही वैशिष्टे हे जाणून घेऊया या लेखातून…
नागरिक नोंदणी सुविधा :-
आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) – नागरिक फक्त मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी वापरुन लॉग-इन करु शकतात.
आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) – वैयक्तिक तपशील व सोशल मीडिया लॉग-इन कॅप्चर करणे जसे की, फेसबुक.
क्षेत्रीय कार्यालयाची व्यापकता :-
आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) – जिल्हा टप्प्यात फक्त चार प्रशासनाचा समावेश होता.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस कार्यालय, महानगरपालिका.
आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) – सद्य:स्थितीतील चार प्रशासकीय कार्यालय सोडून इतर सर्व जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील क्षेत्रीय कार्यालये.
अर्जदाराकडून स्मरणपत्र :-
आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) – स्मरणपत्राची सुविधा नाही.
आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) – 21 दिवसात तक्रारीचे निराकरण न झाल्यास नागरिक संबंधित कार्यालयात ऑनलाईन स्मरणपत्र दाखल करू शकतात.
मुख्यमंत्री हेल्पलाईन-एजंट लॉग-इन सुविधा :-
आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) – सुविधा नाही.
आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) – १८००१२०८०४० मुख्यमंत्री हेल्पलाईन वर आता तक्रार नोंदविता येईल.
फीडबॅक कॉल सुविधा :-
आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती).
आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) – प्रशासकीय सुधारणा व रचना कार्यपद्धती या उपविभागाकडून तक्रार निवारण झाल्यानंतर तक्रारदाराला अकस्मातपणे तक्रार निवारण करण्याबद्दल विचारणा करण्यात येईल व त्याबाबतचा मासिक अहवाल वेळोवेळी प्रशासकीय विभागांच्या निदर्शनास आणण्यात येईल.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मुख्य सचिव यांच्या स्तरावरुन तक्रारींचा आढावा घेण्यात येईल.
१८ सप्टेंबर, २०२३ पासून आपले सरकार २.० अंमलात आल्यानंतर प्रलंबित तक्रारींचे जुन्या पोर्टलवरुनच निराकरण होईल, याची दक्षता संबंधित विभागांनी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी कोणती तक्रार ग्राह्य धरण्यात यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून (पीएमओ कार्यालय) प्राप्त झालेल्या कार्यनियमावली नुसार पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत.
आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींवर मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती –
“अ” आणि “ब” चे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
अ) कार्यवाही न करावयाच्या बाबी:–
- न्यायालयाशी संबंधित असलेले/प्रलंबित असलेले कोणतेही प्रकरण,
- माहिती अधिकाराशी संबंधित तक्रार,
- खाजगी / कौटुंबिक तक्रार,
- सूचना/सल्ला असल्यास,
- देशाच्या सार्वभौमत्व व एकात्मकतेला तडा पोहोचेल अशी तक्रार,
- निनावी टपाल,
- स्वाक्षरी नसलेले टपाल,
- अर्जदाराकडून प्राप्त होणाऱ्या त्रोटक तक्रारी,
- असभ्य भाषेतील अर्थहीन व त्रोटक भाषेतील पत्र,
विविध कमिशन, बॉडीजसाठी नामांकनासाठी विनंत्या, पुरस्कारांसाठी नियमित विनंती, नोकऱ्यांसाठी नियमित विनंत्या, आर्थिक सहाय्यासाठी विनंत्या,
मोफत पास/सवलत तिकिटांसाठी विनंती
भारताच्या आंतरराष्ट्रीय बाबींवर प्रकाश टाकणारी परदेशी लोकांची पत्रे,
कुठल्याही धर्मविषयक बाबी
खाली नमूद केलेल्या वस्तूंच्या स्वरूपात अनुकूलता मागणारी पत्रे आणि यासारख्या वस्तू:-
i) शाळा / महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नियमित विनंत्या
ii) एजन्सी/डीलरशिपसाठी नियमित विनंत्या
iii) दुकान / किऑस्क / तेहबाजारीसाठी नियमित विनंत्या
iv) जमीन / घर / फ्लॅट इ. वाटपासाठी नियमित विनंत्या
ब) कार्यवाही करावयाच्या तक्रारी :-
वर नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही न करावयाच्या तक्रारींशिवाय सर्व तक्रारी.
अशा प्रकारे ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, प्रशासनाकडून तक्रारींचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठ कार्यालयांकडून या प्रक्रियेचे संनियंत्रण इ. संदर्भात शासनाने या प्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधीची विहित कार्यपद्धती निश्चित केली आहे. या कार्यपद्धतीचा अवलंब केल्याने तक्रार दाखल करणे व त्या तक्रारीचे विहीत कालावधीत निवारण करणे सहज सुलभ होणार आहे.




yandanxvurulmus.tJNPEKIqisGi